बुधवार, ५ मार्च, २०१४

Mudra Bandh मुद्रा आणि बंध




मुद्रा आणि बंध
योगशास्त्रामध्ये मुद्रा आणि बंध हे यौगिक प्रकार अतिशय परिणामकारक आणि त्यामुळेच श्रेष्ठ गणले जातात. यांच्या नियमित अभ्यासाने साधकास अलौकिक शक्ती प्राप्त होऊ शकते आणि म्हणुनच या प्रकाराचे तंत्र जपुन अंगी बाणवावे, योग्य गुरुकडुनच त्याची दिक्षा घ्यावी असे अनेक योगग्रंथांमध्ये म्हटले आहे. मुद्रा आणि बंध अधिक परिणामकारक ठरतांत कारण मुद्रा आणि बंध यांचा संबंध मुख्यत्वेकरुन शरीरातील नाडी-केंद्रे, प्रमुख नाड्या आणि अंत:स्त्रावी ग्रंथी (Endocrine Glands) यांच्याशी येतो. म्हणुनच त्यांच्या योग्य अभ्यासाचा परिणाम (आणि अयोग्य अभ्यासामुळे दुष्परिणाम) शरीर, मन,भावना यांच्यावर त्वरीत आणि आणि अधिक तीव्रतेने होतो. याच कारणास्तव मुद्रा आणि बंध यांच्या अभ्यासाविषयी साधकाने अधिक सजग राहावयास हवे.
मुद्रा म्हणजे प्रतिक किंवा anand दायक स्थिती. बंध म्हणजे 'रोखणे' अथवा 'बंधनात अडकवणे' किंवा "नियंत्रण ठेवणे'. अनेक वेळा मुद्रा आणि बंध यांचा अभ्यास एकत्रितपणे केलेला दिसतो. अनेक आसनांमध्येही मुद्रा आणि बंध यांचा समावेश केला गेला आहे. परंतु बंध हा प्रकार स्वतंत्रपणेदेखिल केला जाऊ शकतो. बंधांचा अभ्यास करतांना श्वसनप्रक्रियेवर अनेक प्रकारांनी नियंत्रण आणले जाते. त्यामुळे बंध हा प्राणायामध्ये खूप प्रभावीपणे वापरला जातो. विशेषत: 'कुंभक' स्थितीमध्ये (प्राणायामामधिल "श्वास रोखुन धरण्याची स्थिती") बंधांचा वापर अत्यंत परिणामकारक ठरतो.
मस्तकीय मुद्रा, काया मुद्रा, हस्त मुद्रा, अधर मुद्रा व बंध हे मुद्रांचे प्रकार आहेत. ब्रह्म, योग, सिंह, शांभवी, काकी या काही महत्वाच्या मुद्रा व महा, उड्डियान, जालंधर, मूल वगैरे काही मह्त्वाचे बंध. 
बंधाचे तीन प्रमुख प्रकार म्हणजे जालंदर बंध, उड्डीयान बंध आणि मूलबंध. हे तिन्ही बंध जेव्हा एकत्रितपणे वापरले जातात त्यास्थितीला महाबंध असे नांव दिले आहे. याखेरीज जिव्हाबंध हा आणखी एक बंध अभ्यासला जातो. हे बंध कशाप्रकारे अभ्यासावेत, यावेळी कुठली काळजी घ्यावी, बंधांचे फायदे आणि त्यांच्या मर्यादा याविषयी आपण माहिती करुन घेऊया.
१. जिव्हाबंध
पद्मासन, वज्रासन , सुखासन अथवा कुठल्याही ध्यानासनात बसावे. यापैकी कुठलेही आसन जमत नसल्यास खुर्चीत बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा. जिभेचा शेंडा वरच्या जबड्याच्या आतील बाजुस म्हणजे पुढील दातांच्या मुळाशी हिरड्यांना चिकटवुन ठेवावा. आता संपूण जीभ टाळ्याला लावावी. (साधारणपणे या अवस्थेमध्ये जीभ पटकन सोडल्यास 'ट्टॉक' सारखा आवाज येतो). मग नजर नासिकाग्रावार अथवा भ्रुमध्यावर स्थिर करुन जबडा संपूर्ण उघडावा. या अवस्थेत जिभेखालील स्नायुबंध ताणला जाऊन ताठ उभा राहील. साधारण ३-५ दीर्घ श्वासोच्छ्वासापर्यंत ह्या स्थितीत रहावे. अंतिम स्थितीतुन बाहेर येताना तोंड मिटुन जीभ सैल सोडावी आणि नेहमीच्या स्थितीत आणावी.
प्राणायामात या बंधाचा उपयोग अभ्यंतर कुंभक (श्वास आत घेऊन रोखुन धरणे) किंवा बाह्य (शून्य) कुंभक (श्वास बाहेर सोडुन रोखुन धरणे) या अवस्थांमधे करता येतो.
या बंधाचे लाभ कोणते आहेत ते पाहु.
१. कंठाच्या आणि मानेच्या स्नायू सुदृढ होण्यास मदत होते.
२. घसा आंबणे (sore throat) अथवा घसा फाटणे (throat hoarse) यासारख्या घशांच्या व्याधींवर हा बंध उपयुक्त ठरु शकतो. प्राध्यापक, गायक ,नट ई. मंडळींना या बंधाचा विशेष उपयोग होऊ शकतो.
३. जिभेवर आणि जिभेखालच्या स्नायुबंधावर ताण येतो त्यामुळे जिभेचे जडत्व नाहिसे होण्यास मदत होते. काहीवेळेस तोतरेपणावर देखिल हा बंध ईलाज ठरु शकतो.
४. Carotid Body आणि Sinus Nerve उत्तेजित झाल्याने रक्तदाबावर नियंत्रण होण्यास मदत होते.
५. कंठस्थ ग्रंथी (Thyroid & Parathyroid Glands) त्यांचे कार्य संतुलित होते.
६. लालोत्पादक ग्रंथीं (Salivary Glands) अधिक कार्यक्षम झाल्याने त्याचा फायदा पचनसंस्थेला होतो.
७. चेहर्‍याच्या स्नायुंना व चेहर्‍यावरील त्वचेला चांगलाच व्यायाम मिळाल्याने त्यांचे रक्ताभिसरण वाढते, जेणेकरुन चेहरा तजेलदार होण्यास मदत होते.
या बंधाचे दुष्परीणाम नसल्याने कोणिही व्यक्ती हा बंध करु शकते. अगदी ऑफिसमध्ये खुर्चीत बसल्या बसल्या देखिल हा बंध करु शकता.
आता पुढील बंध पाहू तो म्हणजे जालंदर बंध
जालंधर बंध करताना पद्मासन अथवा सिद्धासनाची बैठक असावी. ते शक्य नसल्यास खुर्चीवर बसुन देखिल हा बंध अभ्यासता येईल. पाठीचा कणा व मस्तक सरळ रेषेत ताठ ठेवावे. दोन्ही तळवे गुडघ्यांवर ठेवावे. डोळे बंद करुन शरीर शिथिल करावे. आता धिम्या गतीने दीर्घ श्वास घ्यावा. श्वास उदरपोकळी आणि छातीमधे भरुन झाल्यावर रोखुन धरावा (अभ्यंतर कुंभक). मस्तक खाली अशा रितीने झुकवावे की हनुवटी मानेखालील खळग्यामध्ये (jugular notch) रुतुन बसेल. या अवस्थेमधे खांदे किंचित पुढे झुकवून हात कोपर्‍यात सरळ करावेत जेणेकरुन मानेवर पडणारा दाब वाढेल. ही झाली जालंधर बंधाची अंतिम अवस्था. या अवस्थेमध्ये आपल्याला झेपेल ईतका वेळ रहावे, उगीच अट्टाहासाने जास्त वेळ श्वास रोखुन ठेवु नये.
बंधामधुन बाहेर येताना हात कोपरात वाकवा, खांदे मागे आणा. मस्तक हळुवार पणे मागे उचला आणि श्वास धिम्या गतीने सोडा. श्वासोच्छवासाची गती नियमित होईस्तोवर डोळे बंद ठेवुन लक्ष श्वासांवर केंद्रित करा. श्वास नियमित झाल्यावर पुन्हा बंधाचा अभ्यास करु शकता. साधारणपणे ३-५ वेळा जालंधर बंधाचा अभ्यास करावा.
या बंधाचा अभ्यास बाह्य कुंभका मधेही करता येतो (श्वास पूर्णपणे बाहेर रोखुन).
या बंधाचे फायदे आता पाहू.
१. या बंधामुळे Carotid Sinus वर दाब पडतो. Carotid Sinus रक्ताभिसरण आणि श्वसन संस्था यांचे कार्य नियंत्रण करते, जसे रक्तामध्ये ऑक्सीजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायाक्सोईड्चे प्रमाण वाढल्यास ह्रदयगती वाढते आणि श्वास जड होतो. Carotid Sinus वर जालंधर बंधाद्वारे कृत्रिमरित्या दाब दिल्याने हृदयगती मंद होऊन श्वास नियमित होण्यास मदत होते.
२. कंठस्थ ग्रंथी (Thyroid & Parathyroid Glands) या कार्यान्वित राहत असल्याने त्यांचे कार्य संतुलित होते.त्यामुळे ताण-तणाव, चिंता आणि क्रोध कमी होऊ लागतात.
हा बंध कोणी करु नये ? ज्यांना Cervical spondylosis चा त्रास आहे अशा व्यक्तिंनी हा बंध टाळावा. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे अशा व्यक्तींनी तसेच उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींनी हा बंध टाळणे ईष्ट. कारण श्वास जास्त काळ कुंभक केल्याने हृदयावर ताण येऊ शकतो. या बंधाचा अभ्यास जाणकार व्यक्तीसोबत करावा ही विनंती.
याच्या पुढील बंध म्हणजे उड्डीयान बंध. सर्व बंधामध्ये हा कठीण पण तितकाच महत्वाचा बंध मानला जातो. "मृत्यु मातंग केसरी" (हत्तीरुपी मृत्युस मात देणारा सिंहरुपी बंध) असे या बंधाचे वर्णन केलेले आढळते. या बंधाच्या सततच्या अभ्यासाने वृद्ध देखिल तरुण होतो असा उल्लेख हठप्रदिपिकेमध्ये केलेला दिसतो.
उड्डीयानं तु सहजं गुरुणा कथितं सदा । अभ्यसेत् सततं यस् तु वृद्धोपि तरुणायते ॥५८॥
नाभेर् ऊर्ध्वम् अधश् चापि तानं कुर्यात् प्रयत्नतः । षण्मासम् अभ्यसेन् मृत्युं जयत्य् एव न संशयः ॥५९॥
सर्वेषाम् एव बन्धानां उत्तमो ह्य् उड्डीयानकः । उड्डियाने दृढे बन्धे मुक्तिः स्वाभाविकी भवेत् ॥६०॥
उड्डीयान म्हणजे "उड्डाण" !! हा बंध केला असता प्राणरुपी पक्षी वर उडतो, म्हणुन या बंधाला उड्डीयान बंध असे संबोधले आहे. शरीरशास्त्राच्या दृष्टीने पाहिले असता, या बंधाच्या अभ्यासादरम्यान पोटामधले अवयव वर उचलले जातात, म्हणुन उड्डीयान हे नांव समर्पक आहे.
उड्डीयान बंधासंबंधी अधिक माहिती जाणुन घेण्याआधी हा कठीण बंध सोपा जावा याकरता एका पूर्वाभ्यासाची तयारी केल्यास उत्तम, तो म्हणजे "तडागी मुद्रा". तडागी मुद्रा केल्याने उड्डीयान बंध करणे अधिक सुलभ होते असा अनुभव आहे.
तडागी मुद्रा करण्याकरता पाठीवर झोपावे. शरीर अगदी शिथिल सोडावे. हात शरीराच्या दोन्ही बाजुस शरीराजवळ ठेवावेत. आता पाय गुडघ्यात दुमडुन शरीराजवळ घ्यावेत पण नितंबांपासुन साधारण एक फूट अंतरावर ठेवावेत. पायांमध्ये साधारण एक-दीड फूट अंतर ठेवुन तळवे जमिनीवर राहतील असे बघावे, संथ लयीत श्वासोच्छवास करावा. आता छाती आणि उदरपोकळी भरेल ईतका दीर्घ श्वास घ्यावा आणि मग संथपणे संपूर्ण श्वास बाहेर काढावा. उजव्या हाताने दोन्ही नाकपुडया गच्च दाबुन धराव्या आणि तोंड न उघडता श्वास घेण्याचा प्रयत्न करावा. (Mock Inhalation) यामुळे पोटात खड्डा पडल्याची अवस्था प्राप्त होते. एखाद्या तलावासारखाच (तडाग) पोटाचा आकृतीबंध होतो म्हणुन याला "तडागी मुद्रा" असे संबोधले जाते, आपल्याला शक्य होईल ईतकाच वेळ या अवस्थेमध्ये रहावे आणि मग सावकाश श्वास घ्यावा. हात आणि पाय सरळ करुन डोळे बंद करावेत आणि श्वासावर लक्ष केंद्रीत करावे जोपर्यंत श्वास नियमित होत नाही.
तडागी मुद्रेचा सराव नियमित केल्याने उदरपोकळीमधिल स्नायुपटल लवचिक होते आणि मग उड्डीयान बंध करण्यात सहजता प्राप्त होते. तडागी मुद्रेचा अभ्यास सहजतेने (आणि सजगतेने) करता येऊ लागला की उड्डीयान बंधाचा अभ्यास करण्यास हरकत नाही.
दोन्ही पायात साधारण एक ते दीड फूट ईतके अंतर घेवुन॑ सरळ उभे रहावे. कमरेपासुन मानेपर्यंत शरीरास बाक देवुन पुढे झुकावे. दोन्ही हातांचे तळवे गुढघ्यावर ठेवावे. हातांची बोटे गुडघ्याच्या आतील अथवा बाहेरील बाजुस आपल्या सोयीनुसार ठेवावीत. यास्थितीमध्ये पोट शिथिल सोडावे.
आता दीर्घ श्वास घ्यावा. मग छाती आणि पोट यांचे आकुंचन करुन सर्व श्वास बाहेर सोडुन द्यावा. हातांचा दाब मांड्यांवर दिल्यास पोट अधिक आकुंचित होण्यास मदत होईल. यास्थितीत जालंधर बंध लावावा. (हनुवटी मानेखालच्या खळग्यात अडकवावी), त्यामुळे श्वास बाहेर रोधण्यास मदत होईल. आता श्वास आत घेण्याचे नाटक करावे (Mock Inhalation) म्हणजे छातीमध्ये पोकळी निर्माण होउन त्याठिकाणी ऋण दाब (Negative Pressure) तयार होईल. या ऋण दाबामुळे पोटातील सर्व स्नायु, उदरपटल (Diaphragm), Abdominal Wall ईत्यादी भाग छातीच्या पोकळीत आत खेचले जातील आणि पोट खपाटीस जाईल. ही उड्डीयान बंधाची अंतिम स्थिती आहे.
या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार रहावे. बंधातुन बाहेर येताना पोट शिथिल करावे. नंतर हाताचा दाब सैल करावा. हनुवटी सैल करुन जालंदर बंध सोडावा.नंतर नियंत्रित रितीने श्वास घ्यावा. सरळ उभे रहावे आणि श्वासोच्छवास नियमित होईपर्यंत हात कमरेवर ठेवुन आरामदायी स्थितीत उभे रहावे. अशा रितीने उड्डीयान बंधाचे एक आवर्तन पूर्ण होते. उड्डीयान बंध हा पद्मासनामध्ये बसुन देखिल करता येतो. हा बंध केवळ बाह्य कुंभकावस्थेमध्येच करावा. पोट रिकामे असतांना म्हणजे मलमूत्र विसर्जनानंतर या बंधाचा अभ्यास करावा.


पोटदुखी, अशक्त छाती, हार्निया, अपेंडीसायटीस, अल्सर, उच्च रक्तदाब, हृदय रोग अशा व्याधी असलेल्या व्यक्तींनी हा बंध टाळणे हितकारक. महिलांनी गर्भावस्थेत हा बंध वर्ज्य करावा.
या बंधाचे लाभ
१. उदरपोकळीतील सर्व अंगांचे आरोग्य या बंधामुळे सुधारते. त्यामुळे पचनक्रिया मलावरोध णि उत्सर्जनक्रिया अधिक कार्यक्षम होतात. अपचन, गॅसेस, मंदाग्नी, मलावरोध ई. दोष नाहिसे करण्यास हा बंध उपयोगी ठरतो.
२. Adrenal Glands आणि Gonad Glands यांच्यावर दाब आल्याने त्यांचे कार्य उत्तम रितीने चालते. Andrenilin च्या निर्मितीमुळे साधकाला उत्साह आणि स्फुर्ती प्रदान करतो.
३. उदरपटल (Diaphragm) वर ऋण दाब आल्याने ते अधिक लवचिक बनते. त्यामुळे श्वसनक्रिया अधिक सुकर होते. दम्याच्या विकारात या बंधाचा अभ्यास लाभदायक ठरु शकतो.
४. पुरुषांमधिल वीर्यदोष तसेच स्त्रियांचे काही आजार यावर हा बंध उपयोगी ठरु शकतो.
५. या बंधाचा अभ्यास नौलीक्रिया साधण्यास अत्यंत उपयुक्त ठरतो.
मुद्रांमधील एक महत्वाची मुद्रा म्हणजे विपरीत करणी मुद्रा.
विपरीत करणी मुद्रेमध्ये खाली डोके वर पायअशी शरीराची स्थिती असते. झोपणे सोडले तर एरवी आपली खाली पाय वर डोकेअशीच स्थिती असते. मात्र, या यौगिक प्रकारात नेहमीपेक्षा वेगळी म्हणजेच विपरीत’ (खाली डोके वर पाय) अशी शरीराची स्थिती होते. म्हणूनच या मुद्रेचे नाव विपरीत करणी मुद्राअसे आहे. रक्ताभिसरण क्रिया योग्य प्रकारे होण्यासाठी, हृदयाकडे योग्य प्रमाणात अशुद्ध रक्त वाहून नेण्याच्या महत्त्वाच्या क्रियेसाठी या मुद्रेचा उपयोग होतो.
सावधानता : तीव्र डोकेदुखी, उच्च रक्तदाब व पोटातील स्नायू दुर्बल असल्यास ही मुद्रा करू नये.
पूर्वस्थिती : पाठीवर झोपलेल्या स्थितीत, दोन्ही पाय एकमेकांजवळ घेऊन पावले, घोटे, गुडघे एकमेकांना चिकटवून ठेवावेत. हाताचे तळवे पालथे ठेवून हात शरीराच्या बाजूला मांड्यांजवळ ठेवावेत.
कृती : दोन्ही पाय हळूहळू उचलून वर न्यावेत. पोटाच्या स्नायंूचे अधिक आकुंचन करून, पाय डोक्याच्या बाजूस नेऊन खाली झुकवावेत. नंतर पार्श्वभाग, कंबर उचलून पाय डोक्याच्या दिशेने अजून खाली येऊ द्यावेत. ज्या क्षणी सहजपणे तोल साधेल त्या वेळी हात कोपरात दुमडावेत. कोपर जमिनीवरच ठेवून हात वर न्यावेत आणि कमरेजवळ हाताच्या तळव्यांनी आधार द्यावा. त्या आधाराने पाय हळूहळू वर न्यावेत आणि सरळ करावेत. पायांचा सर्व भार हाताच्या कोपरांवर असावा. दृष्टी चवड्यांच्या टोकांवर स्थिर करावी किंवा डोळे मिटून उदरपोकळीकडे किंवा श्वासाकडे लक्ष द्यावे. हीच विपरीत करणीमुद्रेची अंतिम स्थिती होय.
श्वासस्थिती : खास लक्ष ठेवून श्वास रोखण्याची प्रवृत्ती टाळावी. नेहमीप्रमाणे श्वासोच्छ्वास चालू ठेवावा.
आवर्तने : सुरुवातीला 3 ते 5 श्वासांची 3 ते 5 आवर्तने करावीत. सरावानंतर आवर्तने कमी करून अंतिम स्थितीमध्ये जास्त काळ रहावे.
मुद्रा सोडताना : ज्या क्रमाने मुद्रेच्या अंतिम स्थितीमध्ये पोचलो, त्याच्या उलट्या क्रमाने हळूहळू पूर्वस्थितीमध्ये यावे.
लाभ : रक्ताभिसरणाची क्रिया वेगाने घडते. पायाच्या शिरा फुगण्याचा (Varicose Veins) त्रास कमी होतो. जठर, आतडी, यकृत, प्लीहा इ. अंगे खाली सरकण्यामुळे निर्माण झालेले अपचन, मंदाग्नी, बद्धकोष्ठता टाळता येतात, व हे अवयव पूर्व स्थितीमध्ये येण्यास मदत होते. वीर्यदोष टाळता येऊन लैंगिक जीवन आरोग्य संपन्न होते. मूळव्याध, गुदद्वारातील चीर, भगेंद्र इ. विकारात अश्विनीमुद्रेसहित ही मुद्रा नियमित अभ्यासण्यामुळे, उपचार म्हणून उपयोग होतो. अंतर्गळ (Hernia) टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून ही मुद्रा उपयुक्त ठरते. स्त्रियांसाठी ही मुद्रा विशेष करून उपयुक्त आहे. गर्भाशयभ्रंशची प्रकृती किंवा संभव या मुद्राभ्यासाने कमी होतो. स्वस्थ गर्भधारणा व सुलभ प्रसुतीकरता(Pre-natal) व प्रसुतीनंतर (Post-natal)  या मुद्रेचा सराव अत्यंत लाभदायक ठरतो.
अनेक योग ग्रंथातून मुद्रा व बंध यांची माहिती आली आहे. स्वामी स्वात्माराम यांनी लिहिलेल्या हठयोग प्रदीपिका या ग्रंथातून हठयोगातील काही मार्गदर्शक तत्वे आणि साधना एकत्र संकलित केल्या. हठयोग प्रदीपिकेचे त्यानी पाच मुख्य भाग केले आहेत. त्यात सर्वात जास्त १२६ श्लोक मुद्रा आणि बंध यासाठी आहेत. आसने आणि शुद्धीक्रिया यां द्वारे प्रथम शरीरशुद्धी करायची. त्यानंतर प्राणायामाने नाडीशोधन करायचे. मग मुद्रांद्वारे सुप्त कुंडलिनीला जागृत करायचे. शेवटी जागृत कुंडलिनीच्या मदतीने नादश्रवणाच्या अभ्यासाद्वारे समाधी साधायची असा मार्ग हठयोग प्रदीपिकेत सांगितला आहे.
अध्यात्मिक उन्नतीसाठी मुद्रा व बंध विशेष महत्वाचे मानले जातात. अनेक संतांनी यांचा उल्लेख केला आहे.
पानरंध्रद्वया माझारीं धनंजया पार्ष्णीं पिडूनियां कांवरुमूळ १०३६
आकुंचूनि अध देऊनि तिन्ही बंध करूनि एकवद वायुभेदी १०३७
कुंडलिनी जागवूनि मध्यमा विकाशूनि आधारादि भेदूनि आज्ञावरी १०३८ (ज्ञानेश्वरी/अध्याय अठरावा)
तेथ शुद्ध मुद्रा वज्रासन कां अंबुजासनही जाण अथवा घालावें सहजासन जे आसनीं मन सुखावे ४०९॥
तेणें मेरुदंड अवक्र शुद्ध समकाया राखोनि प्रसिद्ध मूळाधारादि तीनी बंध अतिसुबद्ध पैं द्यावे ॥४१०॥ (एकनाथी भागवत/अध्याय चौदावा)
येक सांगती मुद्रा च्यारी खेचरी भूचरी चाचरी अगोचरी येक आसनें परोपरी उपदेशिती २२॥ (दासबोध/दशक पांचवा समास चवथा : उपदेशलक्षण)
मुद्रा आणि बंध या योगशास्त्रामधील एका प्रमुख साधनेच्या उचित व नियमित सरावाने साधक ऐहिक व अध्यात्मिक लाभ प्राप्त करू शकतो.

संदर्भः "आरोग्यासाठी योग" - लेखकः पद्मश्री योगाचार्य श्री. सदाशिव निंबाळकर
"आसन प्राणायाम मुद्रा बंध" - लेखकः स्वामी सत्यानंद सरस्वती, बिहार योग विद्यालय

Ahar आहार



आहार
व्यापक अर्थाने आहारामध्ये आपण पंच ज्ञानेन्द्रियाने जे ग्रहण करतो ते सर्व येते; अन्न, द्रव पदार्थ, वायू, विचार, तसेच विश्रांती. पण आधुनिक विज्ञान मात्र मुख्यत: अन्न, द्रव पदार्थ यांचाच विचार आहार म्हणून करते.
आहार व आहारशास्त्र
अन्नपदार्थांची गुणवत्ता, त्यांचे प्रमाण व त्यांमुळे होणारे शरीराचे पोषण या दृष्टीने अन्नपदार्थांचा विचार केल्यास त्याला आहार म्हणतात. उष्णता, खनिजे, जीवनसत्त्वे व इतर पोषक द्रव्ये यांची शरीराला असणारी गरज भागवू शकेल, इतके विविध प्रकारच्या अन्नपदार्थांचे प्रमाण व परिमाण असलेला आहार म्हणजे समतोल आहार होय. या समतोल आहारात अल्पकालीन अशक्तता जाणवू नये याकरिता काही प्रमाणात जादा पोषक द्रव्यांचाही समावेश करणे आवश्यक असते. आहारशास्त्रात प्रत्येक अन्नपदार्थाच्या निरनिराळ्या घटकांची माहिती, ते कसे शिजवावयास पाहिजेत, त्यांचे सेवन केल्यानंतर शरीराच्या नेहमीच्या चयापचयात (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडींत) ते कोणती मदत करतात, त्यांच्यापासून शरीराची वाढ व झीज भरून काढण्यासाठी कोणती पोषणद्रव्ये व ऊर्जा मिळतात याचे ज्ञान मिळते. आहारशास्त्रज्ञ या ज्ञानाचा उपयोग करून खाणावळी व इतर सार्वजनिक भोजनालयांत भोजनाची सर्व व्यवस्था प्रथमपासून म्हणजे निरनिराळे अन्नपदार्थ कोणत्या प्रमाणात घ्यावयाचे यापासून ते थेट ते कशा पद्धतीने शिजवून जेवणगृहात मांडावयाचे व वाढावयाचे ह्यांवर देखरेख ठेवतात. जेवण रुचकर व पौष्टिक असण्याकडे ते लक्ष देतात. रुग्णालयात निरनिराळ्या रोगांत, विशिष्ट प्रकारचा आहार देतात व त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील त्रुटी लवकर भरून येण्यास मदत होते. निरनिराळ्या तापमानांत व उंचीवर लढताना सैनिकांना त्यांची कार्यक्षमता टिकून रहावी असा विशिष्ट आहार देतात अंतराळवीरांनाही यान प्रवासात ठराविक आहार देतात.

आहार योजना : प्रत्येक व्यक्तीला आपले नेहमीचे काम करण्यासाठी किती ऊर्जेची आवश्यकता आहे, हे प्रथम ठरवितात. याकरिता जिवंत राहण्यासाठी शरीरात होणाऱ्या चयापचयासाठी किती ऊर्जा लागते हे मूलभूत चयापचय परिमाणावरून मोजतात. हे परिमाण त्या व्यक्तीची उंची,वजन आणि शरीराचा पृष्ठभाग ह्यावर अवलंबून असते. ह्या ऊर्जेत, ती व्यक्ती करीत असलेल्या कामासाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळवून, त्याला एकूण किती ऊर्जा आवश्यक आहे हे कळते.

आहाराचे महत्व: अन्नाची उपलब्धता असूनही अज्ञानाने निर्माण झालेले आहारातील दोष हे स्वास्थ्य गमावण्याचे एक प्रमुख कारण असते, अनेक आजारांचे कारण असते. केवळ आहारात केलेल्या बदलामुळे ऍलर्जीसारखे दोष पूर्णपणे बरे होऊ शकतात, वजन जास्त असणे (स्थौल्य), बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, मधुमेह, रोहिणी काठीण्य, हृदयविकार, पक्षाघात, ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे, पिचणे, सहज मोडणे), डोकेदुखीचा मायग्रेन हा त्रासदायक प्रकार इत्यादी बऱ्याच आजारांत आहार हाच महत्त्वाचा उपचार ठरतो. क्षय रोग, टायफॉईड, अतिकृशता, प्रतिकारशक्तीचा अभाव इत्यादींचे आहार आणि औषधे यांचे महत्त्व समान असते. एकूणच, आजारातून मुक्त होण्याकरता व प्रकृती चांगली ठेवण्याकरता सकस, संतुलित व षड्‍रसपूर्ण आहार महत्त्वाचा ठरतो. 
आहारात्‌ सर्वभूतानि सम्भवन्ति महीपते । आहारेण विवर्धन्ते तेन जीवन्ति जन्तवः ।। 
आहारापासूनच सर्व जिवांची उत्पत्ती होते, आहारामुळेच त्यांची वाढ होते. थोडक्‍यात, सर्व जीव आहारामुळेच जिवंत असतात. 
न चाहारसमं किंचित्‌ भैषज्यमुपलभ्यते । शक्‍यतेऽप्यन्नमात्रेण नरः कर्तुं निरामयः ।। 
भेषजो नोपपन्नोऽपि निराहारो न शक्‍यते । भिषग्भिराहारो महाभेषज्यमुच्यते ।।
 
आहारासमान दुसरे औषध नाही. कारण आहाराने मनुष्य रोगमुक्‍त केला जातो, परंतु निराहारी मनुष्य केवळ औषधांनी रोगमुक्‍त होऊ शकत नाही. म्हणून वैद्य आहाराला महौषध मानतात. 
आहार संबंधीची काही तत्वे:
१. मांसाहार तसेच तमोगुणी आहार टाळा ! अती तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे पदार्थ अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पिझ्झा, चिप्स, वेफर्स यांसारखे फास्ट फूडखाऊ नका. २. शाकाहार, तसेच सात्त्विक आहार घ्या ! दूध, लोणी, गायीचे तूप, ताक, तांदूळ, गहू, डाळी, पालेभाज्या, फळे यांसारखे किंवा यांपासून बनवलेले सात्त्विक अन्नपदार्थ सेवन करा. ३. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी मिताहार करा ! जेवतांना पोटाचे दोन भाग अन्न सेवन करा. तिसरा भाग पाण्यासाठी आणि चौथा भाग वायूसाठी रिकामा ठेवा.
भोजनाची योग्य पद्धत:
१. पाट किंवा आसन घेऊन त्यावर भोजनासाठी बसा. आसंदी-पटलावर (टेबल-खुर्ची’) किंवा नुसत्या भूमीवर भोजनाला बसणे टाळा. २. शक्यतो सर्व कुटुंबियांनी स्वयंपाकघरात किंवा भोजनगृहात एकत्र भोजनाला बसावे. दक्षिणेकडे तोंड करून भोजनास बसणे टाळा. ३. वाढलेले भोजन प्रथम देवाला अर्पण करा आणि नंतर देवाचा प्रसाद म्हणून ते नामजप करत सेवन करा. ४. कोणाचे उष्टे अन्न खाऊ नका; कारण त्यामुळे वाईट शक्तीं चा त्रास होऊ शकतो. ५. ताटात अन्नपदार्थ टाकू नका. जेवण झाल्यावर ताटाभोवताली पडलेले अन्नकण पायदळी येऊ नयेत; म्हणून लगेच उचला. ६. अन्नदाता सुखी भव ।’, असे म्हणून आणि उपास्यदेवतेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून पाटावरून उठा. ७. जेवल्यानंतर वामकुक्षी करणे: दुपारी जेवल्यानंतर काही मिनिटे डाव्या कुशीवर झोपणे, म्हणजे वामकुक्षी करणे होय. जेवल्यानंतर अन्नपचन नीट व्हावे यासाठी रक्ताचा जास्त पुरवठा पोटाच्या आतड्यांकडे होत असल्याने या काळात मेंदूला रक्तापुरवठा अल्प प्रमाणात होतो आणि मेंदूच्या कार्यात थोडी शिथिलता येते. म्हणून या काळात अगदी थोडा वेळच विश्रांती किंवा झोप घ्यावी.
समतोल आहार:
योगाभ्यासातला आहार हा सात्विक असावा लागतो. ताजं, सकस आणि पौष्टिक अन्न म्हणजे पूर्णान्न खावे. या पूर्णान्नामध्ये भात, भाजी, पोळी, वरण, आमटी, कोशिंबीर सारख्या पदार्थांचा समावेश होतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यात पूर्णान्न खायला कोणालाच वेळ नसतो. लोकं हवं त्यावेळेला हवं ते खातात. फास्ट फूड तसंच इन्स्टंट फूडचा जेवणात सर्वात जास्त वापर केला जातो. फास्ट फूड तसंच इन्स्टंट फूड मधल्या प्रीझरव्हेटीव्हचा शरीरावर परिणाम होतो. शक्यतो सात्विक आहार खाल्ल्यानं शरीरावर वाईट परिणाम होत नाही.
समतोल आहाराच्या कल्पनेप्रमाणे जेवणात पिठूळ पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने,क्षार, जीवनसत्त्वे या सर्वांचा पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी या धान्यांबरोबर डाळी,शेंगदाणे, भाजीपाला, फळभाजी,फळे, तेल, तूप इतक्या गोष्टी आवश्यक असतात. हे पदार्थ अगदी रोज नाही तरी आठवडयातून दोन-तीन वेळेस अदलून बदलून मिळावेत. दूध हा संपूर्ण आहार आहे. कोशिंबिरी, मोड आलेले मूग, ताजी फळे यांचा समावेश करता येईल. विविध तृणधान्ये, मोड आलेली कडधान्ये, पालेभाज्या, शिरांच्या व गरांच्या भाज्या, दूधदुभते, कोशिंबिरी व ऋतूप्रमाणे उपलब्ध होणारे ताजे फळ आपल्या आहारात घेण्याने आहार संतुलित होण्यास मदत होईल.
आहार आठ भागांत विभागता येईल. म्हणजे दोन भाग भात, अर्धा भाग उसळ, अर्धा भाग अन्य भाजी, दीड भाग पोळी, अर्धा भाग आमटी, पक्वान्न दोन भाग असा सात भागांत आहार असेल. त्यानंतर अर्धा भाग सॅलड असावे. म्हणजे चार ते पाच टक्के एवढेच सॅलड खावे. कच्चे अन्न त्याहून अधिक नसावे. ते भरपूर खाल्ले तर त्यानेच पोट भरून जाईल, पण त्यामुळे शरीराची गरज भागणार नाही. पानांची सॅलड असतात त्यावर कोणतीही कीटकनाशक फवारणी केलेली नाही ना, त्याला उग्र वास येत नाही याची खातरजमा करून घ्यावी. काही गोष्टी उकडून, कोशिंबिरी करूनही खाता येतील. बटाटा उकडून त्यावर लोणी, मिरपूड टाकून त्याचे रायते करता येईल. अशा प्रकारे सॅलडमध्ये विविधताही ठेवता येईल.
फळे कापून खाण्याचा फायदा असतो. संत्री, मोसंबी, अननस, फणस अशी फळे वगळता बहुतेक फळे सालीसह खाता येतात. सफरचंदाचा सालासह रस काढला तर हरकत नाही. संत्री, मोसंबी यांचाही रस काढून प्यायला हरकत नाही. मात्र, फळे सकाळी दहानंतर सायंकाळी पाचपर्यंत खावीत. दुधाशी मिसळून कोणतेही फळ खाऊ नका. त्यामुळे मिल्कशेक वगैरे घेऊ नयेत. रात्रीच्या वेळी ज्यूस पिऊ नये. शिकरण खायला हरकत नाही. मात्र त्यात मध किंवा केशर घालून खावे. नुसते केळे दुधात कुस्करून केलेल्या शिकरणाने कफवृद्धी होते.
पांढरी साखर, मीठ, मैदा, आणि वनस्पती तूप खाणे टाळावे. शक्यतो मांसाहार करू नये. ज्या व्यक्ती सामीष आहार करू शकतात, त्यांनी अंड्यातील पांढरा बलक व गोड्या पाण्यात वाढलेली मासळी खावी. मटण, चिकन व अंतस्थ अवयव (लिव्हर, किडनी, ब्रेन) यांचे सेवन टाळावे, कारण या अन्नपदार्थांतून कोलेस्टेरॉल सहज उपलब्ध होते. कोलेस्टेरॉलचे अतिरेकी सेवन रोहिणीकाठीण्याला प्रवृत्त करते. मद्यपान आणि धूम्रपान तर पूर्णपणे वर्ज करावे.
चौरंगी आहार कल्पना:
आहारशास्त्र सर्वांना सोपे करून सांगण्यासाठी चौरंगी आहार ही कल्पना चौरस आहार म्हणून सांगता येईल. चौरंगी म्हणजे चार रंग. पांढरा, पिवळा हिरवा, लाल. कोणत्याही जेवणात हे चार रंग असावे म्हणजे आहार चौरस होतो.
पांढरा - भात, कांदा, लसूण, अंडे, दूध, फ्लॉवर, कोबी
पिवळा - भाकरी, चपाती, वरण, पिवळी फळे, लिंबू, भोपळा, पेरु
हिरवा - हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या
लाल - फळभाज्या, (टोमॅटो), गाजर.

योग्याने योगाभ्यासाला पूरक असा पंच ज्ञानेन्द्रियांचा (अन्न, द्रव पदार्थ, वायू, विचार, तसेच विश्रांती) संतुलित व सात्विक आहार घ्यावा.
संदर्भ:
डॉ. श्री बालाजी तांबे, family doctor, सकाळ